पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत पालकमंत्री अजित पवार काय म्हणाले पहा

वाघोली टाईम्स : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच दक्षता घेतली पाहिजे, त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
येथील विधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील टिंगरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ‘यशदा’चे महासंचालक एस. चोकलिंगम, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, डॉ. प्रदीप आवटे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती घेतली. त्याचबरोबर आवश्यक उपाययोजना सुचवून त्यांची तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही पुरेशी काळजी घेत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. बाधितांची साखळी तोडण्यासाठी निर्बंधाचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन चाचण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
गृह विलगीकरणातील नागरिकांशी संपर्क व समन्वय ठेवावा. गृह विलगीकरणातील बाधित अनेकदा नियम पाळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशावेळी कठोर कारवाई करावी, तसेच गृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच परवानगी द्यावी. संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी पथकांची नेमणूक करावी. कुठेही गर्दी होता कामा नये. मास्क न वापरणाऱ्यांवर वेळीच दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणेला दिले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता निदानासाठी चाचण्यांची क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.
खासदार गिरीश बापट म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक जनजागृती आवश्यक असून यामध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. सोसायटयामध्येही याबाबत जागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुभाष साळुंके यांनी कोविड नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्हयातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे सद्यस्थितीतील नियोजन, कोरोनाबाधित क्षेत्रनिहाय माहिती, कोरोनाबाधित रुग्णसंख्या, क्रियाशिल रुग्ण, कोरोना साथरोग चक्र,हॉटस्पॉट क्षेत्र,वयोगटानुसार बाधित रुग्ण व मृत्यू तपशील, महिनानिहाय कोरोना बाधित रुग्णसंख्या व मृत्यू दर तपशील तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक आवश्यक उपाययोजनाबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोविड-19 ची सद्यस्थितीची माहिती देऊन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

महिला दिनाचे औचित्य साधून सबंध स्त्रीवर्गास पुरुषाचे अनावृत्त पत्र

                हे स्री..सादर प्रणाम…🙏🙏

तुझ्याविषयी आदर व्यक्त करुन तुझी माफी मागायचं तुच्छ धाडस मी या ठिकाणी करु पाहत आहे.. अभय असावं..

              मी तुझा अपराधी आहे…न जाणो कित्येक पिढ्यांचा..! या ना त्या निमित्ताने तुझी छळवणूक करत आलोय..पण तू मात्र निःस्वार्थपणे मला मायेच्या पदरानं आणि निस्सीम प्रेमाच्या ओलाव्याने पाठीशी घालत आलीस…कामाच्या ठिकाणी, शाळेत, घरात, बाजारात, कुठे कुठे तुझा उपमर्द केला नाही म्हणून सांगू..?

             तुला केवळ भोगाची वस्तू म्हणून पाहत आलोय..हे कधी समर्थनीय नव्हतचं..तुझं रुप नाही पाहिलं, वय नाही पाहिलं, नातं नाही पाहिलं, इतकचं काय तुझं समाजातील स्थान ही नाही पाहिलं…फक्त तुझ्यावर बळजबरी करत गेलो..कधी शारीरिक, कधी मानसिक तर कधी सामाजिक..!

                फुलं सुगंधी असतात.. आपण फक्त सुगंध हुंगावा.. जीवन सुगंधित करावं.. पण माझ्या स्वार्थीपणाने तर कळसं गाठला.. मी फुलचं काय कळ्याही तोडत गेलो.. नाजूक, निष्पाप, मनोहारी कळ्या चुरगाळत गेलो..

             मी विध्वंसक नाही.. पण माझ्यातला राक्षस जागा झाला कि मला त्याला आवरता आलं नाही.. त्याने तर माझ्या अस्तित्वाला छेद दिलाय.. त्याला दोष देऊन मी माझी मान सोडवू ईच्छित नाही.. खरा गुन्हेगार तर मीच..!

              तुझं समाजातील मानाचे स्थान मान्य करून मी तुझ्या कर्तबगारी पुढे नतमस्तक होऊ ईच्छितो.. तुलाही स्वतःच्या भावभावना असतात.. स्वप्न असतात.. आशा असतात.. आकांक्षा असतात.. तुलाही गरुडझेप घ्यायची असते.. आयुष्य मनमुरादपणे जगायचं असतं..

                मी आता तुला बंधनात ठेवू ईच्छित नाही.. तुझं स्वतःच वेगळं अस्तित्व असताना तुझ्या प्रगतीआड येण्याचा मला काहीएक अधिकार नाही… तु जशी मला आधार देतेस.. पाठिंबा देतेस… संकटात सोबत खंबीरपणे ऊभी राहतेस.. तसा मीही राहू ईच्छितो.. मला तुझ्या पंखांच बळ होऊ दे.. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुझा हात हातात घेऊ दे..

           जमलचं कधी तर माफीच्या नजरेने मला पाहून घे…. माझे अपराधच इतके भयंकर आहेत की.. युगानुयुगे माझ्यावरच्या खटल्यांचा निकाल लागायचा नाही… लागला तरी तो मरेपर्यंत फाशी असेल किंबहुना त्याहीपेक्षा क्रुर शिक्षा कोणती असेल तर त्या शिक्षेचा एकमेव हकदार मी असेन..

                आज महिलादिनी तुला साष्टांग दंडवत घालून मी स्त्री-स्वातंत्र्याचा पुनरुच्चार करतो.. मानवाबरोबरचा तुझा बरोबरीचा हक्क बिनशर्त मान्य करतो.. सरतेशेवटी तुझ्या जगण्याला स्फूर्तीच्या, उमेदीच्या शुभेच्छा अर्पण करुन माझ्या पत्राचा शेवट करतो..

कळावे,

आपलाच …”पुरुष”

© लेखक – नामदेव सुखदेव गवळी, वाघोली

9767041875, namdevgavali1@gmail.com

1 95 96 97 98